Monday 19 December 2011

वेबसाईटवरून खोटे पॅकेज विकून फसवणूक

हिंगोली -  मुंबईच्या बांद्रा भागात आर्यरूप टूरिझम ऍण्ड क्‍लब रिसोर्ट कंपनीच्या नावाखाली तीन महिन्यांत रक्‍कम तिप्पट करून देण्याचे पॅकेज विकून पंचवीस लाखांची फसवणूक केल्याबद्दल पुणे, कोल्हापूर व चंद्रपूर भागातील तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली तालुक्‍यातील निशाणा येथील श्रीराम शेषराव जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - मुंबई येथील बांद्रा ईस्ट भागात सातारा जिल्ह्यातील खटाव येथील आरोपी रवींद्र देशमुख व वसुंधरा रवींद्र देशमुख यांच्यासह काही जणांनी आर्यरूप टुरिझम ऍण्ड क्‍लब रिसोर्ट ही कंपनी उघडली. त्यानंतर या कंपनीने www.airrupa.in ही वेबसाईट उघडली. आरोपी विश्‍वासराव देशमुख (मुंबई), रामचंद्र थोरात (पुणे), पुंडलिक इंगळे (सोलापूर), अतुल बाबाराव जाधव, कल्पना अतुल जाधव (चंद्रपूर), राहुल वाणी ऊर्फ राहुल पाटील (कोल्हापूर) यांच्यासह पाच संशियातांनी या वेबसाईटवरून पॅकेजची विक्री केली. या वेबसाईटवर कंपनीच्या स्कीमची प्रसिद्धी केली. त्यामध्ये नऊ हजार रुपये भरल्यास नव्वद दिवसांत सत्तावीस हजार रुपये मोबदला देणारी पॅकेज प्रदर्शित केले. यासोबतच पंचवीस हजार, पन्नास हजार, एक लाख, दीड लाख, तीन लाख व पाच लाख याप्रमाणे पॅकेज नव्वद दिवसांत तीनपट करून दिले जातील असे जाहीर केले. या स्कीममध्ये फिर्यादीसह परसराम मोरे (मसोड), नीळकंठ नामदेवअप्पा कापसे (लासिना) आदींनी हिंगोलीच्या बॅंक ऑफ बडोदामध्ये काम करणाऱ्या अतुल जाधव याच्यामार्फत पॅकेजमध्ये सहभाग घेतला.

त्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी दीड हजार रुपये भरले. नंतर पॅकेजच्या रकमा जमा केल्या. नंतर नव्वद दिवसांचा कालावधी लोटल्यावर संबंधित खातेदाराच्या खात्यावर रकमा जमा झाल्याच नाही तेव्हा फिर्यादी श्री. जाधव यांनी मुंबई येथे जाऊन कंपनीच्या कार्यालयात भेट घेतली. तेव्हा तेथील अधिकारी राजेश पांडे यांनी कंपनी चांगल्यापद्धतीने काम करीत आहे असे सांगितले. सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम असल्याने पैसे जमा झाले नाहीत असेही सांगितले. नंतर दुसऱ्यांदा बेंगलोरमध्ये गुन्हा दाखल झाल्याने कंपनीचे अकांउंट लॉक झाले आहे असें सांगितले. राहुल पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील खातेदारांचे पैसे घेण्याचे जबाबदारी घेतली. गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळणार नाहीत असेही सांगितले. या प्रकाराला कंटाळून अखेर श्री. जाधव यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. यावरून तेरा संशयित आरोपींच्या विरोधात 25 लाख 53 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर इंगोले तपास करीत आहेत.

Saturday 17 December 2011

दिव्य मराठीचे "दिव्य ज्ञान" ... वसंत आबाजी डहाके यांच्या पुस्तकांची मनाने बदलली नावे...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली. त्याची बातमी देताना दिव्य मराठीने आपल्या अगाध ज्ञानाची प्रचीती दिली. "सर्वत्र पसरलेली मुळट", शुण्यशेष, अधोलोक आणि मर्त्य, यात्रा हि पुस्तके डहाके यांच्या नावावर असल्याचे बातमीत लिहिले आहे. दिव्या मराठीच्या ज्या प्रतिनिधीने हा शोध लावला त्याने हे ज्ञान कुठून मिळवले हे सांगावे.
डहाके यांच्या पुस्तकांची नावे अशी :
कविता - योगभ्रष्ट (१९७२), शुभवर्तमान (१९८७), शून्:शेप (१९९६), चित्रलिपी (२००६)
कादंबरी - अधोलोक (१९७५), प्रतीबध्य आणि मर्त्य (१९८१)
लेखसंग्रह - यात्रा अंतर्यात्रा (१९९९), मालटेकडीवरून (२००९)
समीक्षा - समकालीन साहित्य (१९९२), कवितेविषयी (१९९९), मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती (२०११), मराठी समीक्षेची सद्यस्थिती (२०११).

Tuesday 6 December 2011

पुरस्कारप्राप्त ‘साकेत’ प्रकाशनाच्या लबाडीचे ‘भागवत’ पुराण

औरंगाबादचे साकेत प्रकाशन ही एक मान्यताप्राप्त प्रकाशन संस्था. मागीलवर्षी महाराष्ट्र शासनातफेर् दिला जाणारा उत्कृष्ठ प्रकाशनासाठीचा ‘श्री.पु.भागवत’ पुरस्कार या प्रकाशनाला प्राप्त झाला. तसेच मुंबई साहित्य संघातर्फे दिला जाणारा ‘वि.पु.भागवत’ पुरस्कारही या संस्थेला यावर्षी प्राप्त झाला. साहजिकच या प्रकाशनाची ग्रंथव्यवहाराबाबत नैतिक जबाबदारी वाढली. यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या. पुण्या मुंबईच्या बाहेर मराठी प्रकाशन व्यवसाय फारसा बहरला नाही. या दृष्टीने विचार करता साकेत प्रकाशनाने औरंगाबादला आपली संस्था स्थापन केली व वृद्धिंगत केली. 1500 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केलेली ही संस्था.
या प्रकाशनाच्यावतीने शिवराज गोर्ले यांची ‘दुरंगी’ या नावाची कादंबरी नुकतीच (डिसेंबर 2011) मध्ये प्रकाशित झाली. ही कादंबरी 1995 मध्ये ‘सामना’ नावाने इंद्रायणी साहित्य (पुणे) या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली होती.  मुक्त अर्थव्यवस्थेची पाठराखण करणारी मराठीतील पहिलीच कादंबरी म्हणून तेंव्हा तिचा गौरवही झाला होता. 
साहजिकच जेंव्हा या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली तेंव्हा हा सगळा उल्लेख त्यावर असावा अशी अपेक्षा होती. किमान हे पुस्तक पुर्वी कुठल्या प्रकाशनाने आणि कोणत्या नावाने प्रकाशित केले आहे हे नोंदवणे आवश्यक होते. पण तसे काहीच घडले नाही. पुस्तक चक्क पहिल्यांदाच निघते अशा आवेशात प्रकाशकांनी ते प्रकाशित केले आहे.
ज्या प्रकाशनाला मौजेच्या दोघाही भागवत बंधूंच्या नावाचा पुरस्कार प्राप्त झाला, ज्या भागवत बंधूंनी आयुष्यभर प्रकाशन व्यवसायाची नैतिकता जपली त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणार्‍या साकेत प्रकाशनाला अशी लबाडी करायची का गरज भासली?
यातली गोम अशी की हे पुस्तक शासनाच्या खरेदीमध्ये, राजा राम मोहन रॉय योजनेच्या खरेदीत, विविध पुरस्कारांसाठी सादर होणार. त्याची खरेदी जर शासनाने इ.स.2011 मधील नवीन पुस्तक म्हणून केली तर या व्यवहाराला काय म्हणायचे? या पुस्तकाला एखादा पुरस्कार प्राप्त झाला तर काय करायचे?
या पुस्तकासाठी प्रकाशक म्हणून जी काही मेहनत इंद्रायणी साहित्यच्या श्याम कोपर्डेकरांनी केली असेल ती तर मातीतच गेली. त्याची भरपाई कशी करायची? पु.ल. देशपांडे यांची पुस्तके देशमुख आणि कंपनीने आधी प्रकाशित केली होती. त्यांच्या पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या/ पुनर्मुद्रणे मौजेनं प्रकाशित केली पण आवर्जून त्यावर पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक म्हणून देशमुखांचे नाव ठेवले. पण शिवराज गोर्ले किंवा साकेत प्रकाशन या दोघांनाही ही नैतिकता पाळाविशी वाटली नाही. या वृत्तीला काय म्हणावे?
साकेतच्या कैक प्रकाशनांवर आवृत्त्यांचे क्रमांकच नसतात. शासकीय खरेदी साठी चाललेली ही लबाडी सामान्य वाचकांच्या लक्षात येत नाही. पण निदान मोठमोठे प्रतिष्ठेचे पुरस्कार देणार्‍या संस्थांच्या तरी लक्षात यावी. आता 16 तारखेला मुबईमध्ये उत्कृष्ठ प्रकाशक म्हणून ‘वि.पु.भागवत’ पुरस्कार स्वीकारल्यावर साकेत प्रकाशन पुरस्काराला उत्तर काय देणार? नवीन प्रकाशकांपुढे काय आदर्श म्हणून ठेवणार? दुसर्‍यांच्या संहिता पैशाच्या जोरावर पळवा आणि परस्पर शासनाच्या ग्रंथखरेदीमध्ये घुसडून पैसे कमवा. शिवाय विविध पुरस्कार मिळवून प्रतिष्ठाही मिळवा. त्यासाठी कुठलीही मेहनत करण्याची गरज नाही. लेखकांना किती आवृत्या निघाल्या हे सांगण्याची आवश्यकता नाही.

Monday 5 December 2011

वीणा मलिक करणार २० लाख डॉलरचा दावा

नवी दिल्ली : एफएचएम मॅगेझिनच्या कव्हरवर वीणा मलिकचा छापण्यात आलेला नग्न फोटो हा बनावट असून, आपण मॅगेझिनकडे २० लाख डॉलरचा अब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचं, वीणा मलिकच्या वकीलांनी म्हटलंय.
भारतीय मॅगेझिन एफएचएमने वीणा मलिकची फसवणूक केली असून, वीणा मलिकच्या मूळ फोटोत फेरफार करण्यात आले आहेत, असंही वीणा मलिकचा वकील अयाझ बिलावाला यांनी म्हटलंय.

एफएचएम मॅगेझिनच्या ज्या प्रतिंवर वीणा मलिकचा नग्न फोटो छापण्यात आला आहे, त्यासर्व प्रति परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. वीणा मलिकचा फोटो फेरफार करून छापण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय.
वीणा मलिकच्या वकीलाने संबंधित मॅगेझिनवर अब्रु नुकसानीचा दावा म्हणून २० लाख डॉलरची मागणी करण्याच ठरवलंय.एचएफएमचे संपादक कबीर शर्मा यांनी हा दावा चुकीचा असल्याचं सांगितलंय. आपल्याजवळ फोटो शूटच्या वेळचा व्हिडीओ असल्याचं कबीर शर्मा यांनी म्हटलंय.

http://www.fhm.com 

Friday 2 December 2011

...सरकारी अधिकाऱ्यांना नाचवलं सापांनी!

लखनौ - एखाद्या सरकारी कार्यालयात कामासाठी वारंवार खेटे घालूनही दाद घेतली जात नसेल तर काय करावं...? आणि समजा अनेक मिनतवाऱ्यांनंतर यदाकदाचित कुणी दाद घेतली, तरी काम करून देण्याच्या बदल्यात लाच मागितली तर...तर काय करावं? तर संबंधित कार्यालयात चक्क साप सोडावेत...! नाही, नाही, हा काही काम करवून घेण्याचा पर्याय मुळीचच होऊ शकत नाही...आणि तसं कुणी कुणाला सुचवूही नये...पण एके ठिकाणी खरंच असं घडलं आहे खरं!

हे जिथं घडलं ते राज्य आहे - उत्तर प्रदेश. गाव - हरय्या आणि ही "करामत' करणाऱ्या व्यक्तीचं नाव - हक्कुला. हक्कुलानं "हरय्या' या गावातील सरकारी अधिकाऱ्यांना अशा रीतीनं हरवलं!

हक्कुला आहे सर्पमित्र आणि त्याला उभारायचं आहे सर्पोद्यान. परिसरातील सरकारी कार्यालयांत घुसणारे साप पकडण्याचं काम तो गेली अनेक वर्ष करतो. पकडलेल्या सापांसाठी एक सर्पोद्यान असावं, अशी त्याची इच्छा आणि त्यासाठी छोटासा भूखंड मिळावा, ही मागणी. तहसीलदार कार्यालयाकडं ही मागणी करकरून तो थकून गेला...पण सरकारी अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी काही त्याची दाद घेतली नाही. इकडं हक्कुलाचा राग मनातल्या मनात साठत गेला आणि तब्बल तीन डझन विषारी सापांच्या रूपानं बाहेर पडला! हक्कुलानं केलं काय, तर आजवर पकडून ठेवलेले हे सगळे साप त्यानं तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडून दिले. या प्रकारानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना पळता भुई अक्षरशः थोडी झाली! जीव वाचवण्यासाठी काहींनी तर खिडक्‍यांमधून उड्याही घेतल्या. अन्य कामांसाठी कार्यालयात आलेल्या सामान्य नागरिकांनीही कार्यालयाबाहेर धूम ठोकत या "सर्पसंकटा'पासून स्वतःचा बचाव केला.

थोडक्‍यात, हक्कुलानं सगळं कार्यालय काही काळ असं पुंगीशिवायच नाचवलं...!

सर्पोद्यानासाठी भूखंडाची मागणी हक्कुला तीनेक वर्षांपासून करत होता...."पकडलेले साप ठेवायला जागा हवी आहे; तेव्हा छोटासा का होईना भूखंड आपल्याला मिळावा,' असं त्याचं म्हणणं. मात्र, "असा भूखंड देण्याची तरतूदच नाही,' असं ठेवणीतलं सरकारी उत्तर देऊन दर वेळी त्याची बोळवण केली जात असे. शेवटी हक्कुलानं तब्बल 36 साप अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडून दिले...आणि नंतर हलकल्लोळ माजला...

हक्कुलाच्या मागणीविषयी तहसीलदार सुभाषमणी त्रिपाठी यांचं म्हणणं असं - "हक्कुलाविषयी आम्हाला सहानुभूती आहे; पण सर्पमित्राला भूखंड देण्याची तरतूदच नसल्यानं आमचाही नाइलाज होता. आता घडल्या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हक्कुलाला हंगामी स्वरूपाचा भूखंड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण हक्कुलानं जे काही केलं ते चुकीचं आहे, हेही आपण विसरता कामा नये.'' हक्कुलाच्या विरोधात स्थानिक पोलिसांकडं तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकारानंतर हक्कुलाला त्याची बाजू मांडायची आहेच. तो म्हणतो, "तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भूखंड देण्याची तयारी दाखविली होती; पण ते लाच मागत असल्यानं रागाच्या भरात मी हे कृत्यं केलं.''

आता, या लाचरूपी सापाचं करायचं तरी काय, याचं उत्तर मात्र कुणाकडंच नाही!