Thursday 27 December 2012

पोलीस निरीक्षक सोमवंशींसह कॉन्स्टेबलविरुद्ध खंडणीची तक्रार



चोपडा - शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शामकांत सोमवंशी व कॉन्स्टेबल विकास कोल्हे यांच्या विरोधात येथील न्यायालयात शिवसेना नगरसेवक सुधाकर महाजन यांच्या फिर्यादीवरुन 20 हजाराची खंडणी मागितल्याची तक्रार फौजदारी खटला नं.151/2012 प्रमाणे कलम 504 (जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ) , 384 (पैसे उकळणे वा खंडणी मागणे) नुसार दाखल करण्यात आला आहे. 
महाजन यांच्या तक्रारीनुसार ते नगरसेवकपदी दोन वेळा निवडले आहेत. त्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही. 25 नोव्हेंबर रोजी चोपडय़ात दंगल घडली, त्यावेळी महाजन हे शेतात त्यांच्या कुटुंबियांसोबत काम करीत होते. दंगलीत सहभाग नसताना सूडभावनेने त्यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. महाजन यांनी त्यावेळी अमळनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. अटकपूर्व जामिनची पूर्तता करण्यासाठी महाजन व त्यांचे भाऊ रघुनाथ महाजन हे शहर पोलीस स्टेशनला गेले असता तपास अधिकारी एपीआय दिलीप बुवा यांनी सोमवंशीच्या दालनात महाजन यांना नेले, तेथे कॉन्स्टेबल विकास कोल्हे हेही हजर होते. दिलीप बुवा तिथून निघून गेले. शामकांत सोमवंशी यांनी महाजन यांच्याकडे 20 हजार रुपये खंडणी मागितली व कॉन्स्टेबल विकास कोल्हे यांच्याकडे देण्यास सांगितले. 
महाजन यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांना सोमवंशी व कोल्हे यांनी शिवीगाळ केली व ‘तुङो राजकारण संपवून टाकू, गुन्हे दाखल करुन घेणे हे आमच्या अख्यत्यारित असते. तुला मोठमोठय़ा गुन्ह्यांमध्ये अडकवून टाकू व कायमचा संपवून टाकू’ अशी धमकी दिली व शिवीगाळ केली, ‘ असे अनेक तीनपाट नगरसेवक सोमवंशीने पाहिले आहेत. तू काय चिज आहे.’ अशीही भाषा त्यांनी वापरली. त्यानंतरही विकास कोल्हे यांनी महाजन यांच्याकडे पैशांसाठी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. ‘व्यवस्था करतो’ असे महाजन यांनी सांगितले.
त्यानंतर 15 डिसेंबरला विकास कोल्हे यांनी महाजन यांना जळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखा चॅप्टर प्रोसिडींगसाठी हजर केले असता पुढील जामिनाची पूर्तता करण्यासाठी 20 डिसेंबर 12 ची मुदत देण्यात आली. दरम्यानच्या काळात ऐपतदार दाखला (सॉलव्हन्सी) व उतारे काढण्यात महाजन यांचा वेळ गेला. याबाबतीत पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार पाठविलेली आहे. मात्र कार्यवाही झाली नसल्याचे महाजन म्हणतात. 
चौकशी होऊन आरोपींना जास्तीत जास्त दंड व शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी फिर्यादीत केली आहे.
दरम्यान नगरसेवक महाजन व त्यांचे वकील अॅड.धर्मेद्र सोनार यांच्याकडे गुन्हा दाखल झाल्याची सांक्षाकित प्रत मागितली असता आज खटला दाखल होण्यास उशिर झाल्याने प्रत देऊ शकत नाही, ती 28 रोजी देण्याचे त्यांनी सांगितले. 
या घटनेची चर्चा होत असून शहर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व पोलिसांमध्येही कुजबुज होत आहे.

Monday 17 December 2012

साहित्य समाजाला शहाणपण शिकवते - कोत्तापल्ले

सोलापूर - साहित्य सबंध संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून, त्यातून समाजाला शहाणपण शिकवता येते. स्वत:ला सोलून घेतल्याशिवाय चांगल्या साहित्यकृतींची निर्मिती होत नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी रविवारी केले. भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ समीक्षक निशिकांत ठकार अध्यक्षस्थानी होते.

 ज्येष्ठ अभिनेत्री विजया मेहता यांचे आत्मकथन असलेला ‘झिम्मा’, यशवंतराव गडाख लिखित व्यक्तिचित्रांचे ‘अंतर्वेध’ आणि महेंद्र कदम यांच्या ‘आगळ’ या कादंबरीला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रत्येकी 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘महाराष्ट्राला प्रागतिक राज्य करण्यात कवी, लेखकांनी मोठी भूमिका बजावली. ज्ञानेश्वर, तुकाराम, चक्रधर यांनी गद्यरूपाने कविताच लिहिल्या आहेत; ज्या समाजाला नीटनेटके जीवन कसे जगावे, याचे उद्बोधन करणार्‍या आहेत.
पुस्तकांतून वाचकांशी सुसंवाद व्हावा, समाजातील नव्या जाणिवांची माहिती व्हावी, हा मुख्य हेतू असतो. जागतिकीकरणाच्या नव्या व्यवस्थेत स्वत:ला स्थैर्य देताना जी घुसमट होते, ती सामान्यांना जाणवते. ती महेंद्र कदम यांनी ‘आगळ’मधून व्यक्त केली. असे अनुभवणार्‍यांनी लिहिते व्हावे. त्यात राजकारणी असावेत, उद्योगपती असावेत. तरच मराठी साहित्य समृद्ध होईल, असे वाटते.’

सुसंवादासाठी 'झिम्मा'  
'झिम्मा' नाट्यकलेचा इतिहास नव्हे; तर इतिहासाची काही पाने उलटतात. नव्या पिढीशी सुसंवाद व्हावा, यासाठीच हा लेखनप्रपंच. जीवनातील नाती शोधून संवाद साधण्याची कला साहित्यात आहे. नाती सांगताना अप्रतिम एकांत मिळतो.
- विजया मेहता

कोंडी फोडायची  
घर, कुटुंब विकलांग होत आहेत. नाती कोरडी पडत आहेत. नवी पिढी जुन्या पिढीला मेंटली अनफिट समजत आहे. या स्थितीत शहाणे गोंधळात पडले, मूर्ख त्यांच्या मतांवर ठाम आहेत. ही कोंडी साहित्यिकच फोडू शकतील. 
-यशवंतराव गडाख


माणूसपणा शोधा  
जन्माचे सार्थक काय, याचा शोध घेतला. त्याने ज्या व्यवस्थेत गेलो, तिथे माणूसपण नाकारले गेले. तिथूनच लेखन सुरू झाले. स्वकीयांशी लढून गाव-शहर जोडू पाहणार्‍यांच्या कथा मांडल्या. माणसाच्या वस्तूकरणाची प्रक्रिया मांडली. 
-महेंद्र कदम  

Wednesday 5 December 2012

आंबेडकरी जनतेच्या आनंदावर वृत्तवाहिन्यांचे श्रेयवादाचे विरजण


गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा मुद्दा बुधवारी निकाली निघाला. संसदेच्या दोन्ही सभागृहात जागा देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली. बाके वाजवून सर्व खासदारांनी त्याचे स्वागत केले. मुबंई आणि राज्यातील इतर शहरांमध्ये आंबेडकरी जनतेने पेढे वाटून, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. मात्र, हा आनंदोत्सव दाखवत असतानाच, काही वृत्तवाहिन्या या आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कांबळे यांची प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे प्रतिक्रिया घेत होते. तेव्हा सहाजिकच आता तुम्हाला काय वाटते हा प्रश्न होता आणि त्याचे स्वाभाविक उत्तर होते, हा आनंदाचा क्षण आहे. आंबेडकरी जनतेचा हा विजय आहे.

आंबेडकरी जनतेच्या आनंदात याचवेळी बेकीचे बीज पेरण्याचे काम काही वृत्तवाहिन्या करताना दिसल्या. या विजयाचे श्रेय कोणाला देणार, हा प्रश्न वारंवार नेत्यांना विचारला जात होता. मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत इंदू मिल हस्तांतरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. याबद्दलची सूचक माहिती मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी संध्याकाळी दिली. तेव्हापासूनच काही वाहिन्यांनी एकाच वेळी सर्व रिपाई नेत्यांना फोनवर सोबत घेऊन चर्चा सुरु केली. या आनंदाच्या क्षणी चर्चेचा सूर मात्र श्रेय कोणाला देणार असा होता. दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. त्यांनाही वरील आशयाचेच प्रश्न विचारले जात होते. हे प्रश्न खोदून खोदून विचारुन वृत्तवाहिन्यांना नेमके काय साधायचे होते ?

बाबासाहेबांचे स्मारक हा काही राजकीय विषय नाही. सुरुवातीला विजय कांबळेंनी सनदशीर मार्गाने ही मागणी काही वर्षांपूर्वी लावून धरली होती. आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतानाही त्यांच्या पक्षाने विधिमंडळात किंवा संसदेत ही मागणी आग्रहाने मांडली, असे चित्र कधी पाहायला मिळाले नाही. माजी खासदार रामदास आठवले यांनीही त्यांच्या खासदारकीच्या काळात इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावे, यासाठी संसदेत एखादी कविता ऐकविल्याचे आठवत नाही. रिपब्लिकन सेनेने गेल्या वर्षी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात इंदू मिलचा ताबा घेत उग्र आंदोलन केले आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्परतेने इंदू मिलबाबात केंद्र सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले हे सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ आहे. त्यासाठी चव्हाण यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या दिल्लीतील संपर्काचा पूरेपूर वापर करुन घेतला आणि मागणी मान्य करुन घेतली.

श्रेयाच्या राजकारणावरून वृत्तवाहिन्या या नेत्यांमधील दुराव्याचा फायदा घेत आठवलेंना विचारतात की, आनंदराज म्हणत आहेत की, हे त्यांचे यश आहे? तेव्हा त्यांचे उत्तर असते की, कोणी काहीही म्हटले तरी हा आंबेडकरी जनतेचा विजय आहे. आम्हीही त्यासाठी आंदोलन केले होते. हा संपूर्ण आंबेडकरी जनतेचा लढा होता आणि तो आम्ही जिंकला आहे.

यात आठवले हे कुठेही आनंदराज किंवा इतर नेत्यांचे श्रेय नाकारत नाही, हे स्पष्ट असतानाही वृत्तवाहिन्या दाखवतात की, हे आमचेच यश आहे असे आठवले म्हणत आहेत, असे का? वृत्तवाहिन्यांना वास्तव मांडायचे आहे, की वादाची ठिणगी टाकायची आहे? आनंदराज यांनीही कुठेही म्हटले नाही की हे मी केले! त्यांनीदेखील प्रत्येक वृत्तवाहिनीला हेच सांगितले की, हा आंबेडकरी जनतेचा विजय आहे. तरीही वृत्तवाहिन्या ओढून ताणून आंबेडकरी चळवळीतील नेत्यांमध्ये श्रेयाचे राजकारण सुरु आहे, हे का बिंबवतात? त्यासाठी अर्ध्या-अर्ध्या तासाचा विशेष कार्यक्रम घेऊन त्यांच्यात का शाब्दिक युद्ध लावून देतात? वृत्तवाहिन्यांनी असे करण्यामागे काय 'राजकारण' आहे,  हे काही समजत नाही. स्मारकाची घोषणा झाल्यानंतर सगळेजण मान्य करीत आहेत की, हा सर्वांच्या आंदोलनाचा आणि आंबेडकरी जनतेचा विजय आहे. अशावेळी वृत्तवाहिन्यांनी श्रेयवादाचे पालुपद लावून धरणे कितपत इष्ट आहे? उगाच भावेनेचे राजकारण चिघळवणे इष्ट आहे का ? नेत्यांना स्क्रिनवर समोरासमोर आणून एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला लावून जनतेच्या आनंदावर विरजण टाकणे बरोबर आहे का?
- उन्मेष खंडाळे

Friday 30 November 2012


'झी'च्या संपादकांना १४ दिवसांची कोठडी

नवी दिल्ली - झी वृत्त वाहिनीच्या दोन वरिष्ठ संपादकांना आज दिल्लीच्या एका न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्या कंपनीकडून १00 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली होती.
महानगर दंडाधिकारी गौरव राव यांनी झी न्यूजचे प्रमुख सुधीर चौधरी व झीचे बिझनेस संपादक समीर अहलुवालिया यांची १४ डिसेंबरपर्यंत तिहार कारागृहात रवानगी केली. तपास पूर्ण झाला असून, त्यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.
या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येत आहे, असे न्यायालय म्हणाले. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, आज या दोघांच्या वतीने नव्याने जामीन याचिका करण्यात आली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

Tuesday 17 July 2012

'रिंगण’ आषाढी अंकाच्या वेबसाईटचे नांदेड येथे प्रकाशन


नांदेड - संत म्हटले की फक्त आत्मा, परमात्मा, देव, धर्म याच गोष्टी येऊन आदळतात. पण अध्यात्मापेक्षा आजच्या काळात त्यांचा सामाजिक विचारच अधिक महत्त्वाचा आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी सोमवारी संध्याकाळी नांदेड येथे केले. रिंगण या पहिल्या आषाढी अंकाच्या www.ringan.in या वेबसाईटचे प्रकाशन त्यांच्या हस्ते एका छोटेखानी पण विविध विचारांचा समन्वय झालेल्या कार्यक्रमात पार पडले.
रिंगण वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकाच्या इंटरनेट आवृत्तीचे प्रकाशन नामदेव पुण्यतिथीच्या मुहूर्तावर मराठी-पंजाबी संस्कृतीचे समन्वय केंद्र असणा-या नांदेड येथे आयोजित करण्याचे औचित्य साधण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी, शीख धर्माचे अभ्यासक प्रा. हरमहेंद्र सिंग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद नांदेड शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम यांनी आपले विचार व्यक्त केले.
संतांचे योगदान मोठेच आहे. पण त्याचा विचार करताना साध्या साध्या कष्टक-यांनीही संस्कृतीच्या उत्क्रांतीत आपला वाटा उचलला होता, याचे भान ठेवले पाहिजे, असे हबीब म्हणाले. मानवतेच्या दृष्टिकोनातून संतांचे कार्य महत्त्वाचे आहे. पण त्यांच्या कामाची तुलना किंवा संबंध विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीशी जोडण्याचे काहीच कारण नाही. तसे करण्याऐवजी आज संतांचे आदर्श आपल्या जीवनात कसे आणता येतील, याचा विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील विपर्यास दूर करण्याचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. तशाच पद्धतीने संतांच्या इतिहासातील विपर्यास दूर करण्याच्या कामाची सुरुवात रिंगणने केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संत नामदेवांनी देशभर फिरून पिचलेल्यांना बळ दिले. पण आज त्यांचे नाव घेणारे घराच्याही बाहेर पडण्यात उत्सूक नसतात. भाषा प्रांतांच्या आजच्या भांडणात नामदेवांचे राष्ट्रीय स्वरूपाचे कार्य अधिक महत्त्वाचे ठरते, अशा शब्दांत त्यांनी नामदेवांच्या मोठेपणाची मीमांसा केली. आज नामदेव असते तर त्यांनी जागतिक पातळीवर विचारांच्या प्रसारासाठी इंटरनेटसारख्या माध्यमांचा वापर केला असता. त्यामुळे रिंगणइंटरनेटवर येणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
संत नामदेवांनी उत्तर भारतात संतपरंपरेची सुरुवात केली, असे सांगत प्रा. रंगनाथ तिवारी यांनी उत्तर भारतावरचा नामदेवांचा प्रभाव सविस्तर मांडला. रिंगणमध्ये नामदेवांच्या अनेक पैलूंवर अभ्यासपूर्ण लेख असून कोणताही महत्त्वाचा मुद्दा सुटलेला नाही, असे प्रमाणपत्रच त्यांनी दिले. तर प्रा. डॉ. जगदीश कदम यांनी संशोधनाच्या दृष्टीने रिंगणच्या अंकाला फार मोल असल्याचे सांगितले. आजही परिवर्तनाच्या चळवळीत नामदेवांनी घालून दिलेला संयमित बंडखोरीचा धडा महत्त्वाचा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. तर प्राचार्य हरमहेंद्र सिंग यांनी अस्खलित मराठीतील भाषणात गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या जीवनातील प्रसंगांचा महिमा कसा वर्णन केला आहे, हे समजावून सांगितले. आज सर्वधर्मसमन्वयाचीच नाही, तर सर्वधर्मस्वीकाराची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी नामदेवांच्या संदर्भात मांडले.
रिंगणचे संपादक सचिन परब यांनी वेबसाईट सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. व्यंकटेश चौधरी यांनी निवेदन केले. तर पत्रकार राजीव गिरी यांनी आभार मानले. नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. त्यात माजी आमदार गंगाधरराव पटणे, शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल अलुरकर, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, दैनिक उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर, वसंत मय्या, डॉ. प्रा. पृथ्वीराज तौर, प्रा. यशपाल भिंगे इ. उपस्थित होते. या कार्यक्रमाला शीख समाजातील अनेकांनी हजेरी लावली होती.

Wednesday 27 June 2012

आषाढी एकादशीच्या दिवशी 'रिंगण' आषाढी अंकाचं प्रकाशन

रिंगण या पहिल्या आषाढी अंकाचं प्रकाशन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवार ३० जून रोजी पंढपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतेय. देशभर फिरून केलेले रिपोर्ताज, मान्यवर अभ्यासकांचं नामदेवांविषयीचं चिंतन आणि भास्कर हांडे या आंतरराष्ट्रीय चित्रकाराने मुखपृष्ठावर साकारलेले अभ्यासपू्र्ण नामदेव, अशी या अंकाची काही वैशिष्ट्य.

आपल्याकडे दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा आहे. गुढीपाडवा आणि गणपतीचेही विशेषांकही निघतात. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा. मग आषाढी अंक का नाही? म्हणूनच 'आषाढीचा वार्षिक अंक' ही नवी संकल्पना यंदाच्या आषाढी एकादशीपासून प्रत्यक्षात येत आहे. 'रिंगण' नावाने सुरु होणा-या या वार्षिकाच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन आषाढी एकादशीला म्हणजे शनिवार ३० जूनच्या पहाटे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

यावर्षीपासून 'रिंगण' दर आषाढी वारीला प्रसिद्ध होणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक अंगाने मागोवा असेल. दरवर्षी एक संत आधुनिक दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न त्यात असेल. कारण गेली आठशे वर्षे संतपरंपरा हाच महाराष्ट्राचा मुख्य सांस्कृतिक प्रवाह आहे. यात अध्यात्मासोबतच सामाजिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. हा दृष्टिकोन आजच्या काळानुसार मांडणं हा या अंकामागचा उद्देश आहे.

या वर्षीचा विशेषांक संतशिरोमणी नामदेवांवर आहे. आठशे वर्षांपूर्वी समतेच्या विचारांची ध्वजा घेऊन नामदेवराय तामिळनाडू ते सिंध पंजाबपर्यंत फिरले. त्यांनी अनेक भाषांमध्ये लिहिलं. नानक, कबीर, नरसी मेहता, मीरा, रोहिदास अशा उत्तरेतील संतपरंपरेचा पाया घातला. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेला आकार दिला. सर्व जातीच्या संतांना एकत्र केलं. चंद्रभागेच्या तीरावर क्रांती केली. म्हणूनच आज देशभर श्री विठ्ठलापेक्षाही नामदेवांची मंदिरं जास्त आहेत. पाकिस्तानातही त्यांची मंदिरं आहे. देशातील लाखो लोक त्यांचं नाव आपली ओळख म्हणून लावतात. त्यांच्या या कार्याची ओळख यंदाच्या 'रिंगण'च्या १२० पानी अंकातून करून देण्यात आली आहे.

सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड या पत्रकारांनी 'रिंगण' चं संपादन केलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रशिल्पकार भास्कर हांडे यांनी चितारलेलं नामदेवांचं अत्यंत अभ्यासपूर्ण असं रूप 'रिंगण' च्या मुखपृष्ठावर आहे. उत्तर भारतात पंजाब (नीलेश बने), दिल्ली (गिरीश अवघडे), राजस्थान (दानाराम छिपा), गुजरात (धवल पटेल) असं जिथपर्यंत नामदेव गेले त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन लिहिलेले स्पेशल रिपोर्ट या अंकात आहेत. याशिवाय नरसी नामदेव हे नामदेवांचं जन्मगाव (प्रशांत जाधव), पंढरपूर ही कर्मभूमी (पराग पाटील) या ठिकाणी जाऊन केलेलेही रिपोर्ताज यात वाचायला मिळतील. अनेक मान्यवरांचे नामदेवांविषयचे लेख यात आहेत. भालचंद्र नेमाडे, भारतकुमार राऊत, अशोक कामत, नि. ना. रेळेकर, रामदास डांगे, वीणा मनचंदा, शिवाजारीव मोहिते, संजय सोनवणी, आप्पासाहेब पुजारी, मंगला सासवडे, सुनील यावलीकर, दिलीप जोशी, श्यामसुंदर सोन्नर, अंजली मालकर अशा मान्यवर लेखकांचं नामदेवांविषयीचं चिंतन यात आहे. आपले आडनाव नामदेव लावणा-या महाराष्ट्राबाहेरच्या लाखो लोकांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांची हर्षदा परब यांनी घेतलेली मुलाखत तसेच लंडन येथील खालसा कॉलेजच्या प्राचार्य डॉ. माधवी आमडेकर यांचा लेख यातून ग्लोबल नामदेव समोर आलेले आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या साठीनिमित्त त्यांची राजा कांदळकर यांनी घेतलेली प्रदीर्घ मुलाखत या अंकाचं आकर्षण ठरावे.

आषाढी एकदाशीला पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापुजेनंतर पहिलं दर्शन घेणा-या वारक-यांचा सत्कार कार्यक्रम दरवर्षी होत असतो. त्याच कार्यक्रमात 'रिंगण' चं प्रकाशन होईल. याशिवायય www.ringan.in या वेबसाईटवरही लवकरच हा अंक जशाच्या तसा वाचता येईल. तसेच या अंकात घेता न आलेले लेख तसेच अंकात असलेल्या लेखांच्या सविस्तर आवृत्त्या यात वाचता येतील. शिवाय नामदेवांविषयीचे अंकात असलेले नसलेले फोटोही या वेबसाईटवर उपलब्ध असतील.

या १२० पानी देखण्या अंकाची किंमत फक्त ६० रुपये आहे. राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या पुस्तकांच्या दुकानांत हा अंक विक्रीसाठी उपलब्ध असेल. मनोविकास प्रकाशना (०२०- ६५२६२९५०) तर्फे या पुस्तकाचं वितरण करण्यात आलंय.




संपर्कः सचिन परब ९९८७०३६८०५

Tuesday 26 June 2012

विश्वास नांगरे पाटील यांना "आदित्य गौरव "पुरस्कार घोषित

औरंगाबाद - आदित्य प्रकाशनाच्या वतीने देण्यात येणारा "आदित्य गौरव "पुरस्कार विश्वास नांगरे पाटील   ( अतिरिक्त पोलिस आयुक्त, मुंबई )यांना घोषित झाला आहे .मागच्या वर्षी हा पुरस्कार समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना देण्यात आला होता.
आदित्य प्रकाशनाचे संचालक विलास फुटाणे यांच्या संकल्पनेतून सकालेला हा पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो . विश्वास नांगरे पाटील यांनी २३/११ ला जो मुंबईवर आतंकी हल्ला झाला होता .तो हल्ला त्यांनी
तळहातावर प्राण घेऊन रोकला.होता त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे अनेकांचे प्राण वाचले .त्याच्या या कर्तव्य कठोर कार्याबद्दल त्याना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे

Monday 25 June 2012

सोलापुरात सकाळवर वृत्तपत्र विक्रेत्यांचा बहिष्कार

सोलापूर - अंकाचे कमिशन वाढवून द्यावे, ही मागणी फेटाळून लावणा-या सकाळवर मंगळवार दि.२६ जून रोजी विक्रेत्यांनी बहिष्कार टाकला.त्यामुळे सोलापुरात सकाळचे वाटप झाले नाही.सकाळच्या ऐवजी विक्रेत्यांनी दिव्य मराठी व सुराज्यचे अंक टाकले.त्यामुळे सोलापुरात सकाळची मोठी कोंडी झाली आहे.गंभीर बाब म्हणजे  सकाळच्या एका अधिका-याने संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब लाड यांना अत्यंत खालच्या पातळीवर अपशब्द वापरले.त्यामुळे विक्रेत्यात संतापाची लाट पसरली आहे.

पुढील मजकूर वाचण्यासाठी क्लीक करा...

बेरक्या उर्फ नारद

Sunday 24 June 2012

`सरहद'ने उठवला लोकमतकरांचा बाजार

पुण्यातील पत्रकारांची खाबुगिरी कोणत्या थराला गेली आहे आणि खालपासून् वरपर्यंत सगळीकडे कशी खाबुगिरी चालली आहे याचे  किस्से अनेकदा ऐकायला मिंळतात. पत्रकारीतेला कलंक असलेल्या या खाबू गटाची अंदाधुंदी गेल्या काही वर्षात भयानक वाढली आहे. त्यामुळे बिल्डर्स, शैक्षणिक संस्थांचे चालक आणि शासकीय अधिकारी त्रस्त झाले आहेत. त्याला लगाम घालण्याची आवश्यकता होती. `सरहद' या संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी अखेर मांजराच्या गळ्यात घंटा बांधलीच.

पुढील मजकूर बेरक्या उर्फ नारद ब्लॉगवर वाचा
बेरक्या उर्फ नारद

Saturday 23 June 2012

ही बांबळे स्कूल काय भानगड आहे रे भौ....

नाशिकच्या मेरी परिसरातील आर टी ओ कॉलनीचा चौक. दुपारची 1 ची वेळ.
चौकाच्या बाजूला तीन आलिशान गाड्या थांबलेल्या. सिंघमफेम अजय देवगण,
दबंगफेम सलमान खान आणि राऊडी राठौरफेम अक्षयकुमार रस्त्यावर उभे राहून
पत्रकारीतेच्या बांबळे स्कूलचा पत्ता विचारत आहेत. नाशिककरांना अशा
कोणत्याही स्कूलचे नाव माहित नाही. तीघेजण सांगतात...अरे बाबा या स्कूलचे
चालक एक साखळी दैनिकाचे मुख्यसंपादक आहेत..

पुढील मजकूर झुंजार बातमीदार या ब्लॉगवर वाचा... 

झुंजार बातमीदार  

आवश्य वाचा..

महाराष्ट्रात वेब जर्नालिझममध्ये अव्वल असणा-या ज्येष्ठ पत्रकार  सुनील ढेपे (  मुख्य संपादक, उस्मानाबाद लाइव्ह ) यांच्यावर सकाळने काही दिवसांपुर्वी कॉपी राईटचा गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी सुनील ढेपे यांनी त्यांच्या उस्मानाबाद लाइव्ह या ई - पेपरवर घेतलेला खरपूस समाचार आवश्य वाचा..




माणुसकीचे नाते 

न केलेले गुन्हे  

Friday 13 January 2012

सोशल नेटवर्किंग कंपन्या संकटात, न्यायालयीन कारवाईला सरकारचा हिरवा कंदिल


नवी दिल्ली : गूगल, फेसबुक, याहू आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या इंटरनेट कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक ती परवानगी केंद्र सरकारने जारी केली आहे. यासंदर्भात एका प्रकरणावर सुनावणी करताना दिल्लीतल्या पतियाला हाऊस कोर्टाने केंद्र सरकारला आज सायंकाळपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

गूगल, फेसुबक, याहू सारख्या साईट्सवर असलेला अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासंदर्भात न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या याचिकेवर प्राथमिक सुनावणी करताना स्थानिक न्यायालयाने वेगवेगळ्या 22 इंटरनेट कंपन्यांना न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. मात्र या कंपन्यांनी कोर्टाच्या एकाही समन्सला उत्तर दिलं नाही की स्वतः कोर्टात हजर राहिले. त्यामुळे आज कोर्टाने या सर्व कंपन्यांची खरडपट्टी काढत त्यांच्यावर कठोर म्हणजे चीन सरकारप्रमाणे बंदीही घालण्याची भूमिका घेतली होती.

त्यावर या सर्व बड्या इंटरनेट आणि सॉफ्टवेअर कंपन्यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत, कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशापासून सुटका करण्याची मागणी केली. मात्र त्यावर अजून काहीही निर्णय झालेला नाही.

दिल्ली कोर्टाने विदेशात मुख्यालय असलेल्या वेगवेगळ्या इंटरनेट, सॉफ्टवेअर आणि सोशल नेटवर्किंगमधल्या कंपन्याना समन्स बजावून आपल्या साईट्सवर अश्लील, आक्षेपार्ह तसंच धार्मिक तेढ वाढवणारा मजकूर अपलोड केल्याबद्धल गुन्हेगारी कारवाई क करू नये, अशी विचारणा केलीय. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जारी केलेल्या कायदेशीर समन्समध्ये या सर्व कंपन्यांना आपल्या वकीलामार्फत किंवा प्रतिनिधीमार्फत 13 मार्च रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

13 मार्च रोजी असलेल्या पुढील सुनावणीसाठी या कंपन्यांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहता यावं, यासाठी त्या सर्व कंपन्यांना नोटीस मिळणं गरजेचं आहे. त्यावर सरकारने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयावर संबंधित कंपन्यांपर्यंत कोर्टाचे समन्स पोहोचविण्याची जबाबदारी टाकली आहे.
गूगल फेसबुक
गूगल फेसबुक


आज न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये फेसबुकची बाजू मांडणाऱ्या वकीलाने न्यायालयाच्या ही बाब न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली. कोर्टाने समन्स बजावलेल्या 21 पैकी तब्बल दहा कंपन्या ह्या भारताबाहेरच्या आहेत. त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी प्रोसेस इश्यू करावा लागेल. त्यानंतर न्यायालयाने संबंधित कंपन्यांना समन्स इश्यू करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मदत घेण्याचे आदेश जारी केले.

स्थानिक पत्रकार विनय राय यांनी दिल्लीतील पटियाला न्यायालयात धाखल केलेल्या एका खाजगी तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने सोशल नेटवर्किंग आणि इंटरनेट, सॉफ्टवेअर कंपन्याच्या विरोधात आक्षेपार्ह मजकुराबाबत ही कायदेशीर कारवाई सुरू केलीय.

कायदेशीर समन्स जारी करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये गूगल, फेसबुक, यूट्यूब, मायक्रोसॉफ्ट आणि याहू यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या 13 मार्च या तारखेला समन्स बजावण्यात आलेल्या सर्व कंपन्यांना स्वतः हजर राहण्याचेही आदेश कोर्टाने दिलेत.

कोर्टाच्या निर्देशानंतर तक्रारकर्त्यांचे वकील शशी त्रिपाठी यांनी पुन्हा एकदा सुधारित पत्त्याची यादी न्यायालयाला देणार असल्याचं स्पष्ट केलं. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत संबंधित कंपन्यांना समन्स बजावण्यात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आपण आवश्यक ती खबरदारी घएत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान फेसबुकचं प्रतिनिधीत्व करणारे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायालयाला आजचं कामकाज स्थगित करून पुढची तारीख देण्याची विनंती केली, त्याचं कारण स्पष्ट करताना त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याच प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, 16 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे, दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत काहीही आदेश दिलेला नसल्यामुळे पतियाळा हाऊस कोर्टाचली सुनावणी एक दिवस पुढे ठकलण्याची विनंतीही त्यांनी केली. गूगलच्या वतीनेही अशीच विनंती न्यायालयाला करण्यात आली. गूगलने आपली बाजू मांडताना सांगितलं की न्यायालयाने यापूर्वी बजावलेल्या समन्स या ऑर्कूट, यूट्यूब आणि ब्लॉगस्पॉटच्या भारतातील कार्यालयांना बजावण्यात आल्या आहेत. यासर्व समन्स त्यांच्या मुख्यालयाला बजावण्यात आल्या पाहिजेत.

मात्र न्यायालयाने आजचं कामकाज स्थगित करून समन्स बजावण्यासाठी पुढची तारीख देत असतानाच केंद्र सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्रालयाला आदेश दिले की यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका काय आहे, ती आजच्या आज स्पष्ट व्हायला हवी. त्यावर माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वकीलाने आजच सरकार यासंदर्भात आपली भूमिका कोर्टात जाहीर करेल, असं न्यायालयाला सांगितलं. त्यानुसार केंद्र सरकारने आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत विदेशात मुख्यालय असलेल्या सर्व विदेशी कंपन्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

न्यायालयात सर्वप्रथम 23 डिसेंबर 2011 रोजी हा मुद्दा सुनावणीसाठी आल्यानंतर न्यायालयाने तब्बल 21 सोशल नेटवर्किंग कंपन्यांना नोटीसा बजावल्या. त्यावर या सर्व कंपन्यांच्या भारतातील प्रतिनिधींनी उच्च न्यायालयात धाव घेत परदेशातील मुख्यालयांना नोटीसा बजावल्या जाव्यात अशी मागणी केली, त्यावरील दिल्ली उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी अपेक्षित आहे.

दरम्यान गूगलने मात्र यासंदर्भात आपली भूमिका स्पष्टस करताना गूगलवरील कोणताही कॉन्टेन्ट म्हणजेच आक्षेपार्ह असो की नसो, हटवण्यासंदर्भात काहीच कारवाई करता येत नसल्याचं स्पष्ट केलंय. गूगल ही एक बेवसाईट नसून ते फक्त सर्च इंजिन आहे, त्यामुळे गूगल स्वतः आशय किंवा मजकूर तयार करत नाही, अशी भूमिकाही गूगलने घेतली आहे. त्यांच्या या युक्तिवादावर न्यायालयाने संतप्त होत, तर मग गूगलवर चीनमध्ये आहेत, तसे निर्बंध का घालू नयेत, अशी विचारणाही केली.

सरकारने न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट करताना संदर्भात सर्व 21 कंपन्यांवर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करता येईल एवढा सकृतदर्शनी प्राथमिक पुरावा असल्याचा अहवाल न्यायालयात दिला आहे. 

दिल्लीचे मेट्रोपॉलिटन जज सुदेश कुमार यांच्या न्यायालयात सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, ही परवानगी देणाऱ्या प्राधिकाऱ्याने सर्व तपशील स्वतः चाळला असून सोशल नेटवर्किंग, इंटरनेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या तब्बल 21 कंपन्यांवर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई चालवता येईल, एवढा तपशील असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. या सर्व कंपन्यांवर भारतीय दंड विधानाच्या 153 अ, 153 ब, 295अ नुसार कारवाई करता येईल, असंही सरकारने न्यायालयाला स्पष्ट केलं आहे.

अशा प्रकारचा अहवाल देण्याचा आदेश न्यायालयानेच आज सरकारला दिला होता. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान विभागाने हा दोन पानी अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

Friday 6 January 2012

'जिस्म २' चं वादळ

मुंबई - जिस्म २ या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतचं चालली आहे. त्यातच आता निर्माती पूजा भट्टने या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्टरही बऱ्याच चर्चेत आहे.

जिस्म या चित्रपटानेही अशाच प्रकारे प्रेक्षकांमध्ये उत्सूकता निर्णाण केली होती. चित्रपटाचा तोच अंदाज कायम ठेवत जिस्म २ ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात केवळ बोल्ड आणि सेन्शूअस दृष्यांचा मसाला घालण्यात आला आहे. चित्रपटाचे पोस्टर देखील तेच दर्शवतोय. हे पोस्टर पाहून अनेकांच्या मनात वादळ उठले आहे हे नक्की.

या चित्रपटाचे निर्मीती (प्रोड्यूसर) पुजा भट्टने केली आहे तर दिनो मोरीआने सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

Thursday 5 January 2012

तृतीय पंथीयांचे संमेलन

नंदुरबार - उत्सुकता शिगेला पोहचविणार्‍या तृतीय पंथीयांच्या राष्ट्रीय संमेलनाला अक्कलकुवाजवळील सोरापाडा गावात प्रारंभ झाला. देशभरातील साडेतीनशेच्या आसपास तृतीय पंथीयांची संमेलनाला हजेरी लागली असून खिचडीची तुला करून या संमेलनाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. तर सोरापाड्याच्या राणीला नायक पद बहाल करण्यात आले.

अक्कलकुवाजवळील सोरापाडा या गावात राहणारी बुलबुल नायक या तृतीय पंथीयाने किन्नर समाजाची अर्थात तृतीय पंथीयांची स्थापना केली. बुलबुल नायकाच्या मृत्यूला दोन वर्ष होत आहेत. त्याच्या मृत्यूनंतर सोरापाडा गावात प्रथमच राष्ट्रीय संमेलन भरविण्यात आले. बुलबुल नायकाच्या जागेवर आज राणीला नायक पद बहाल करण्यात आले. या वेळी राणी नायक या तृतीय पंथीयाला आपले अर्शू अनावर झाले होते.

रेखा नायक बर्‍हाणपूर, जरीना नायक हैदराबाद, शबनम नायक, मीना नायक नागपूर, मुमताज नायक या पंचमंडळाच्या उपस्थितीत आज परंपरेनुसार संमेलनाला प्रारंभ झाला. ढोलक वाजवून गाणे गात तृतीय पंथीयांनी नृत्य केले. जयपूर, मध्य प्रदेश व खान्देशातील तृतीय पंथीय आज संमेलनात दाखल झाले. गुरू शिष्यांची परंपरा या तृतीय पंथीयात दिसली. गुरूंचा आदर राखतांना शिष्य कमालीचे शिस्त दाखवित होते. अत्तराचा सुगंध या संमेलनात दरवळत होता. प्रत्येक तृतीय पंथीयांच्या अंगावर सोन्याचे दागिने दिसत होते. विविध गावातून आलेल्या तृतीय पंथीयांनी रोख रक्कम जाहीर केली. राणी नायकाला नायक पद दिल्यानंतर या नायक पदाची लाज राख, अशी शपथ देण्यात आली. पंच मंडळाने नायकाला आशीर्वाद दिले. खिचडीची तुला करण्यामागे आपल्या पूर्वजांना र्शद्धांजली वाहणे, असा असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

सविताबाईचे सौंदर्य  
सोरापाड्यातील राष्ट्रीय संमेलनात देखणे तृतीय पंथीयांनी हजेरी लावली असून नागपूरहून आलेली राखीबाई, मुंबईहून आलेली सविताबाई या इतक्या देखण्या आहेत की कुठल्याही लावण्यवतीचे सौंदर्य त्यांच्या पुढे फिके पडावे. 



आम्हाला मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचे नाही. आम्हाला टीव्हीवर झळकायचे नाही. बस आम्हाला इतरांसाठी दुआ मागायची असते. आम्ही दुसर्‍यांसाठी शुभकामना करतो. आमचे पोशिंदे सुखाने जगले पाहिजेत म्हणून आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. लग्न समारंभात आम्ही जातो. तिथे नाचतो. कुणाला मुलगा झाला तर आम्ही आशीर्वाद देतो; पण हा आशीर्वाद आम्ही परमेश्वराकडून मागतो. आमच्यापैकी अनेक जण निरक्षर आहेत. फक्त 20 टक्के तृतीय पंथीय साक्षर आहेत. 
रंजीता नायक, तृतीय पंथीय

Monday 19 December 2011

वेबसाईटवरून खोटे पॅकेज विकून फसवणूक

हिंगोली -  मुंबईच्या बांद्रा भागात आर्यरूप टूरिझम ऍण्ड क्‍लब रिसोर्ट कंपनीच्या नावाखाली तीन महिन्यांत रक्‍कम तिप्पट करून देण्याचे पॅकेज विकून पंचवीस लाखांची फसवणूक केल्याबद्दल पुणे, कोल्हापूर व चंद्रपूर भागातील तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली तालुक्‍यातील निशाणा येथील श्रीराम शेषराव जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - मुंबई येथील बांद्रा ईस्ट भागात सातारा जिल्ह्यातील खटाव येथील आरोपी रवींद्र देशमुख व वसुंधरा रवींद्र देशमुख यांच्यासह काही जणांनी आर्यरूप टुरिझम ऍण्ड क्‍लब रिसोर्ट ही कंपनी उघडली. त्यानंतर या कंपनीने www.airrupa.in ही वेबसाईट उघडली. आरोपी विश्‍वासराव देशमुख (मुंबई), रामचंद्र थोरात (पुणे), पुंडलिक इंगळे (सोलापूर), अतुल बाबाराव जाधव, कल्पना अतुल जाधव (चंद्रपूर), राहुल वाणी ऊर्फ राहुल पाटील (कोल्हापूर) यांच्यासह पाच संशियातांनी या वेबसाईटवरून पॅकेजची विक्री केली. या वेबसाईटवर कंपनीच्या स्कीमची प्रसिद्धी केली. त्यामध्ये नऊ हजार रुपये भरल्यास नव्वद दिवसांत सत्तावीस हजार रुपये मोबदला देणारी पॅकेज प्रदर्शित केले. यासोबतच पंचवीस हजार, पन्नास हजार, एक लाख, दीड लाख, तीन लाख व पाच लाख याप्रमाणे पॅकेज नव्वद दिवसांत तीनपट करून दिले जातील असे जाहीर केले. या स्कीममध्ये फिर्यादीसह परसराम मोरे (मसोड), नीळकंठ नामदेवअप्पा कापसे (लासिना) आदींनी हिंगोलीच्या बॅंक ऑफ बडोदामध्ये काम करणाऱ्या अतुल जाधव याच्यामार्फत पॅकेजमध्ये सहभाग घेतला.

त्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी दीड हजार रुपये भरले. नंतर पॅकेजच्या रकमा जमा केल्या. नंतर नव्वद दिवसांचा कालावधी लोटल्यावर संबंधित खातेदाराच्या खात्यावर रकमा जमा झाल्याच नाही तेव्हा फिर्यादी श्री. जाधव यांनी मुंबई येथे जाऊन कंपनीच्या कार्यालयात भेट घेतली. तेव्हा तेथील अधिकारी राजेश पांडे यांनी कंपनी चांगल्यापद्धतीने काम करीत आहे असे सांगितले. सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम असल्याने पैसे जमा झाले नाहीत असेही सांगितले. नंतर दुसऱ्यांदा बेंगलोरमध्ये गुन्हा दाखल झाल्याने कंपनीचे अकांउंट लॉक झाले आहे असें सांगितले. राहुल पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील खातेदारांचे पैसे घेण्याचे जबाबदारी घेतली. गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळणार नाहीत असेही सांगितले. या प्रकाराला कंटाळून अखेर श्री. जाधव यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. यावरून तेरा संशयित आरोपींच्या विरोधात 25 लाख 53 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर इंगोले तपास करीत आहेत.

Saturday 17 December 2011

दिव्य मराठीचे "दिव्य ज्ञान" ... वसंत आबाजी डहाके यांच्या पुस्तकांची मनाने बदलली नावे...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली. त्याची बातमी देताना दिव्य मराठीने आपल्या अगाध ज्ञानाची प्रचीती दिली. "सर्वत्र पसरलेली मुळट", शुण्यशेष, अधोलोक आणि मर्त्य, यात्रा हि पुस्तके डहाके यांच्या नावावर असल्याचे बातमीत लिहिले आहे. दिव्या मराठीच्या ज्या प्रतिनिधीने हा शोध लावला त्याने हे ज्ञान कुठून मिळवले हे सांगावे.
डहाके यांच्या पुस्तकांची नावे अशी :
कविता - योगभ्रष्ट (१९७२), शुभवर्तमान (१९८७), शून्:शेप (१९९६), चित्रलिपी (२००६)
कादंबरी - अधोलोक (१९७५), प्रतीबध्य आणि मर्त्य (१९८१)
लेखसंग्रह - यात्रा अंतर्यात्रा (१९९९), मालटेकडीवरून (२००९)
समीक्षा - समकालीन साहित्य (१९९२), कवितेविषयी (१९९९), मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती (२०११), मराठी समीक्षेची सद्यस्थिती (२०११).

Tuesday 6 December 2011

पुरस्कारप्राप्त ‘साकेत’ प्रकाशनाच्या लबाडीचे ‘भागवत’ पुराण

औरंगाबादचे साकेत प्रकाशन ही एक मान्यताप्राप्त प्रकाशन संस्था. मागीलवर्षी महाराष्ट्र शासनातफेर् दिला जाणारा उत्कृष्ठ प्रकाशनासाठीचा ‘श्री.पु.भागवत’ पुरस्कार या प्रकाशनाला प्राप्त झाला. तसेच मुंबई साहित्य संघातर्फे दिला जाणारा ‘वि.पु.भागवत’ पुरस्कारही या संस्थेला यावर्षी प्राप्त झाला. साहजिकच या प्रकाशनाची ग्रंथव्यवहाराबाबत नैतिक जबाबदारी वाढली. यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या. पुण्या मुंबईच्या बाहेर मराठी प्रकाशन व्यवसाय फारसा बहरला नाही. या दृष्टीने विचार करता साकेत प्रकाशनाने औरंगाबादला आपली संस्था स्थापन केली व वृद्धिंगत केली. 1500 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केलेली ही संस्था.
या प्रकाशनाच्यावतीने शिवराज गोर्ले यांची ‘दुरंगी’ या नावाची कादंबरी नुकतीच (डिसेंबर 2011) मध्ये प्रकाशित झाली. ही कादंबरी 1995 मध्ये ‘सामना’ नावाने इंद्रायणी साहित्य (पुणे) या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली होती.  मुक्त अर्थव्यवस्थेची पाठराखण करणारी मराठीतील पहिलीच कादंबरी म्हणून तेंव्हा तिचा गौरवही झाला होता. 
साहजिकच जेंव्हा या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली तेंव्हा हा सगळा उल्लेख त्यावर असावा अशी अपेक्षा होती. किमान हे पुस्तक पुर्वी कुठल्या प्रकाशनाने आणि कोणत्या नावाने प्रकाशित केले आहे हे नोंदवणे आवश्यक होते. पण तसे काहीच घडले नाही. पुस्तक चक्क पहिल्यांदाच निघते अशा आवेशात प्रकाशकांनी ते प्रकाशित केले आहे.
ज्या प्रकाशनाला मौजेच्या दोघाही भागवत बंधूंच्या नावाचा पुरस्कार प्राप्त झाला, ज्या भागवत बंधूंनी आयुष्यभर प्रकाशन व्यवसायाची नैतिकता जपली त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणार्‍या साकेत प्रकाशनाला अशी लबाडी करायची का गरज भासली?
यातली गोम अशी की हे पुस्तक शासनाच्या खरेदीमध्ये, राजा राम मोहन रॉय योजनेच्या खरेदीत, विविध पुरस्कारांसाठी सादर होणार. त्याची खरेदी जर शासनाने इ.स.2011 मधील नवीन पुस्तक म्हणून केली तर या व्यवहाराला काय म्हणायचे? या पुस्तकाला एखादा पुरस्कार प्राप्त झाला तर काय करायचे?
या पुस्तकासाठी प्रकाशक म्हणून जी काही मेहनत इंद्रायणी साहित्यच्या श्याम कोपर्डेकरांनी केली असेल ती तर मातीतच गेली. त्याची भरपाई कशी करायची? पु.ल. देशपांडे यांची पुस्तके देशमुख आणि कंपनीने आधी प्रकाशित केली होती. त्यांच्या पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या/ पुनर्मुद्रणे मौजेनं प्रकाशित केली पण आवर्जून त्यावर पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक म्हणून देशमुखांचे नाव ठेवले. पण शिवराज गोर्ले किंवा साकेत प्रकाशन या दोघांनाही ही नैतिकता पाळाविशी वाटली नाही. या वृत्तीला काय म्हणावे?
साकेतच्या कैक प्रकाशनांवर आवृत्त्यांचे क्रमांकच नसतात. शासकीय खरेदी साठी चाललेली ही लबाडी सामान्य वाचकांच्या लक्षात येत नाही. पण निदान मोठमोठे प्रतिष्ठेचे पुरस्कार देणार्‍या संस्थांच्या तरी लक्षात यावी. आता 16 तारखेला मुबईमध्ये उत्कृष्ठ प्रकाशक म्हणून ‘वि.पु.भागवत’ पुरस्कार स्वीकारल्यावर साकेत प्रकाशन पुरस्काराला उत्तर काय देणार? नवीन प्रकाशकांपुढे काय आदर्श म्हणून ठेवणार? दुसर्‍यांच्या संहिता पैशाच्या जोरावर पळवा आणि परस्पर शासनाच्या ग्रंथखरेदीमध्ये घुसडून पैसे कमवा. शिवाय विविध पुरस्कार मिळवून प्रतिष्ठाही मिळवा. त्यासाठी कुठलीही मेहनत करण्याची गरज नाही. लेखकांना किती आवृत्या निघाल्या हे सांगण्याची आवश्यकता नाही.