Monday 31 October 2011

जैन फाऊंडेशनचे उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार जाहीर

जळगाव - येथील भवरलाल अँण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन आणि बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यि पुरस्कारांची निवड काल जैन हिल्स येथे झालेल्या निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जाहीर केली. बहिणाई सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार अनुराधा पाटील यांना, बालकवी ठोमरे सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना तर ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक पुरस्कार सदानंद देशमुख यांना जाहीर करण्यात आला.

साहित्य क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारात बहिणाई सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार, बालकवी ठोमरे सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार आणि
ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक पुरस्कारांचा समावेश आहे. नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पुरस्कार समितीची बैठक आज जैन हिल्स येथे झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री सन्मानित मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ कवी पद्मश्री सन्मानित ना.धों. महानोर, ज्येष्ठ समीक्षक गो. मा. पवार, साहित्यिक रवींद्र इंगळे चावरेकर, साहित्यिका डॉ. हेमा जावडेकर, डॉ. वृंदा भार्गवे, बहिणाबाई चौधरी मेमोरिअल ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन हे या निवड समितीचे सदस्य आहेत. मराठी साहित्यात विविध संस्थांतर्फे पुरस्कार दिले जातात. हे लक्षात घेऊन पुरस्कारार्थींची निवड अचूक व्हावी या उद्देशाने ही समिती अधिक व्यापक करण्यात आली. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष भवरलाल जैन यांना समितीने विशेष निमंत्रित म्हणून बोलाविले होते.

पुरस्कारांसाठी समितीने महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून शिफारशी मागविल्या होत्या. यात बहिणाई सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार अनुराधा पाटील यांना, बालकवी ठोमरे सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना तर ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक पुरस्कार सदानंद देशमुख यांना जाहीर करण्यात आला.

येत्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे पुरस्कार जळगाव येथे विशेष समारंभात प्रदान केले जाणार आहेत. या द्विवार्षिक पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रोख 51 हजार रुपये, शाल, स्मृतीचिन्ह व श्रीफळ असे आहे. भवरलाल जैन यांनी पुरस्कारामागची भूमिका निवड समितीच्या सदस्यांसमोर विशद केली.