Friday 4 November 2011

तरूणीकडून इंटरनेट चॅटिंगने लाखोंचा गंडा

नाशिक : इंटरनेट चॅटींगच्या माध्यमातून बंगळूरच्या तरूणीशी झालेली ओळख, नाशिकच्या मनिष अग्रवालला चांगलीच महागात पडलीय.. प्रियंका अवस्थी नावाच्या मुलीनं त्याला लाखो रुपयांना गंडा घातलाय..परंतू धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी प्रियंकावर गुन्हा दाखल होण्या ऐवजी उलट नाशिक पोलीसांच्या मदतीने बंगळूर पोलीसांनीच मनिषचं अपहरण करुन त्यांला बेकायदेशीररित्या  कोठडीत डांबून लुटल्याचं उघड झालंय. या गुन्ह्यामुळे नाशिक पोलिसांच्या गुन्हेगारीच्या इतिहासात आणखी एक काळं पान लिहलं गेलंय.

लाखो रूपये तर गेले पण बेदम मारही

जनरल स्टोअर्सचा मालक असलेला मनिष इंटरनेटमुळे लाखो रुपयांना गंडवला तर गेलाच शिवाय त्याला बंगळूरच्या जेलची हवा आणि बेदम मारही खावा लागलाय.. प्रियंका अवस्थी नावाच्या बँगलोरमधल्या मुलीशी अग्रवाल कुटूंबियांची ३ वर्षापुर्वी इंटरनेट चॅटींगच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर अवस्थी आणि अग्रवाल कुटुंबिय एकमेकांचे घरोब्याचे संबंध झाले. एकमेकांच्या घरीही त्यांचं येणं-जाणं झालं.आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने एमबीए शिक्षण घ्यायला मदत करावी या प्रियंकाच्या याचनेला भुलुन अग्रवाल कुटूंबियांनी तिला पावणे तीन लाख दिले. मात्र प्रियंकाचे चारित्र्य शुध्द नाही. इंटरनेट, प्रेमप्रकऱणांच्या माध्यमातून आर्थिक फसवणुक करणं आणि नंतर खोट्या पोलीस तक्रारी करुन लुटणं प्रियंका आणि तिचा बंगळूरला पोलीसांत असलेल्या भावाचा उद्योग असल्याची आपबिती प्रियंकाच्या एका मित्राने मनिषला सांगितली.आणि थोड्याच दिवसांत मनिषला याची प्रचितीही आली.

फुकटात जेलची हवा
प्रियंकाकडून झालेल्या फसवणुकीची तक्रार मनिषने नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे ६ महिन्यांपूर्वीच केली होती. त्यानंतर प्रियंकाच्या स्टेट बँकेच्या अकाऊंटवर असलेल्या बेहिशेबी मालमत्तेची माहितीही सायबर क्राईम विभागाने मिळवली. मात्र पोलिसांकडून तपासाऐवजी अर्थकारण झालं आणि सगळी चक्रं उलटी फिरली. प्रियंकावर कारवाई होण्याच्या ऐवजी बंगळूर पोलीसांनी थेट नाशिकमध्ये येऊन पंचवटी पोलीस ठाण्यातच मनिषला मारहाण केली. कुठलंही वॉरंट नसताना मनिषला बंगळूरला नेलं.. विशेष म्हणजे यावेळी आरोपी आशुतोष हा तिथल्या पोलिसांच्या सोबत होता.अदखलपात्र गुन्हा असतानाही मनिषला पोलीसांनी दोन दिवस जेलमध्ये डांबलं. त्याचे ५० हजार आणि लॅपटॉपही घेतला.शब्दश: मनिषचं अपहरणच केलं.

सहा महिन्यानंतर नोंदवली तक्रार
कागदपत्रांचा विचार करता मनिषविरुध्द गुन्हे दाखल झाल्यानंतर काही तासात पोलिसांनी मनिषला नाशिकमधून उचलून नेलं. अदखलपात्र गुन्ह्याबद्दल त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना माहिती न देताच पंचवटी पोलिसांना हाताशी धरुन मनिषला लुटणं हा मोठ्या कटाचाच भाग असल्याचं स्पष्ट आहे. पोलिसांचा धाक मनात असतानाही ६ महिने सातत्याने लढा देत सीसीटीव्ही फुटेज, माहितीच्या अधिकाराचा वापर करुन यासंबंधीचे पुरावे मनिषने गोळा केले. त्यामुळे नाईलाजाने का होईना ६ महिन्यांनंतर नाशिक पोलीसांनी मनिषची तक्रार नोंदवून घेतलीय.. मात्र बंगळूरचा सबइन्स्पेक्टर मोनेश्वरकडून मनिषला आजही जीवे मारण्याच्या धमक्या येतायेत.. या सगळ्यानंतर आता मनिषला आपल्या सुरक्षिततेची चिंता लागलीय.. त्यामुळे निदान इतर तरूणांनी इंटरनेवरून तरूणींशी चॅटींग करणाऱ्या तरूणांनी धडा घेणं गरजेचं आहे.